
शिरपूर, ता. १२ : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी शिरपूर तालुक्यातील आदिवासीबहुल कोडीद गावाला भेट देत ग्रामसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

ग्रामसंवादादरम्यान नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसी संदर्भातील समस्या विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच गावातील अंगणवाडी सेवा, आदिवासी आश्रमशाळेची स्थिती, शाळा पूर्वतयारी, वनपट्टाधारकांचे ई-केवायसी, ॲग्री-स्टॅक व पीएम किसान योजनेचा लाभ याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
यावेळी कोडीद परिसरातील प्रमुख कृषी पिके, खत व बियाण्यांचा पुरवठा वेळेवर होत आहे का, याचीही चौकशी करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकान तसेच सेतू केंद्राला भेट देऊन सेवा पुरवठ्याची पाहणी केली आणि नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

या दौऱ्यात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
