शिरपूर (प्रतिनिधी) नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल आणि आमदार काशिराम पावरा यांनी केले आहे.
धुळे येथे गुरुवारी दि. ११ जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) बैठकीत पिक विमा योजनेबाबत चर्चा झाली. यावेळी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामासाठी विमा संरक्षण मिळवून शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
राज्य शासनाने सन २०२५-२६ पासून उत्पादनाधारित सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली असून केंद्र शासनाचीही त्यास मान्यता आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक व उत्पादनक्षमतेला चालना देणे, ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
योजनेअंतर्गत खरीप पिकांसाठी दोन टक्के, रब्बी पिकांसाठी दीड टक्का तर नगदी पिकांसाठी पाच टक्के इतका मर्यादित विमा हप्ता भरावा लागणार आहे. एका वर्षासाठी सर्व अधिसूचित पिकांचा जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक विमा नुकसानभरपाईसाठी ई-पीक पाहणीअंतर्गत पीक नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.
शासनाने शासनाने बहुतांशी सर्वच पिकांना जोखीमस्तर हेक्टरी ७० टक्के जाहिर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हेक्टरी ज्वारी ८२.५०, बाजरी २४०, नाचणी ९५, भुईमूग ११२.५०, सोयाबील १३ हजार ७५०, तीळ ६७.५०, मूग ७०, उडीद ६२.५०, तूर ११७.५०, कापूस ९००, मका ३६०, कांदा १७०, ज्वारी जिराइत ९०, गहू बागायती पिकासाठी ४५० रूपये, हरभरा ३६०, उन्हाळी भुईमूग १०१.५०, रब्बी कांदा २२५ रूपये विमा हप्ता रक्कम भरणे आवश्यक असून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार आहे.
विकास सोसायट्यांमार्फत कर्जदार तसेच बिगर कर्जदार सभासदांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा तसेच प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
