
शिरपूर, प्रतिनिधी : शहरातील भंडारी टाकी परिसरात रविवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत फळांचे गोदाम आणि व्यापाऱ्याचा संसार जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारी टाकी परिसरातील ‘हिंदुस्तान फ्रुट’ या फळांच्या गोदामाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात सापडले. गोदामात साठवून ठेवलेले केळीचे सुमारे ८० ते १०० कॅरेट, एक बर्गमन दुचाकी तसेच व्यापारी अश्फाक बागवान यांच्या कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरून आणखी मोठी दुर्घटना टळली.
या आगीत व्यापारी अश्फाक बागवान यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
