शिरपूर : बदलत्या शैक्षणिक धोरणांशी, आधुनिक अध्यापन पद्धतींशी आणि नवीन अभ्यासक्रमाशी सुसंगत राहण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याबरोबरच ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी केले.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित टीईटी परीक्षा प्रशिक्षण वर्गाचा समारोप शनिवारी (दि. १३) राजगोपाल भंडारी हॉल येथे उत्साहात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सीईओ डॉ. उमेश शर्मा, अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील, सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उमेश शर्मा म्हणाले, टीईटी परीक्षा ही केवळ अनिवार्य पात्रता नसून शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. दैनंदिन अध्यापनाशी संबंधित मूलभूत संकल्पना या अभ्यासक्रमात समाविष्ट असल्याने ही परीक्षा अध्यापन कौशल्य विकसित करण्याची संधी म्हणून स्वीकारावी. नियोजनबद्ध अभ्यासातून प्रत्येक शिक्षकाने स्वतःला अधिक सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले.
अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बदलता अभ्यासक्रम, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराविषयी मार्गदर्शन केले. स्पर्धात्मक युगात सातत्यपूर्ण अध्ययन आणि नव्या अध्यापन तंत्रांचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षण वर्गात अध्ययन-अध्यापनशास्त्र, गणित, मराठी, इंग्रजी, पर्यावरण अभ्यास, बालमानसशास्त्र आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर डॉ. डी. पी. बाविस्कर, डॉ. एस. एन. पाटील, महेश चौधरी आणि रवींद्र धनगर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले, तर प्रदीप गहिवरे यांनी आभार मानले. प्रशिक्षण वर्गाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा उपक्रमांमुळे शिक्षकांची गुणवत्ता अधिक सक्षम होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
