
शिरपूर/प्रतिनिधी:– दुचाकीवर हेल्मेट न घालणाऱ्यांविरुद्ध आता कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्य व केंद्र शासनाचे सर्व सरकारी कर्मचारी, निमशासकीय कार्यालयांतील कर्मचारी, खासगी आस्थापनांतील कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी १५ जून २०२६ पासून हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
संबंधित आदेशानुसार कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी दुचाकीवर हेल्मेटशिवाय येणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू व गंभीर दुखापती रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हेल्मेट परिधान करूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेटशिवाय प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अटळ असल्याने वाहतूक नियमांचे पालन करण्याचेही शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये देत सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे
