
शिरपूर (प्रतिनिधी ) अवाजवी वीजबिले, शेतकऱ्यांना अपुरा वीजपुरवठा तसेच महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात शिरपूर फर्स्टच्या वतीने मंगळवारी शिरपूर येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील नागरिकांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना वापराच्या तुलनेत जादा वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ग्राहकांना कमी वापर असूनही हजारो रुपयांची वीजबिले देण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार आठ तास वीजपुरवठा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यामध्ये कपात होत असल्याने शेतीकामांवर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, चुकीच्या वीजबिलांची पडताळणी करून दुरुस्ती करण्यात यावी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान नागरिकांनी अवाजवी वीजबिलांचे तोरण तयार करून ते महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
