तऱ्हाडी (प्रतिनिधी)शिरपूर तालुक्यातील अंतर्ली
अंतर्ली शिवारात गेल्या काही दिवसांपासून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला वन विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वीरीत्या जेरबंद केले. अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी रेस्क्यू मोहिमेमुळे बिबट्याचा जीव वाचला असून परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

अंतर्ली शिवारात बिबट्याच्या हालचाली दिसून आल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनसंरक्षक एम. डी. साळुंखे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ईश्वर वसावे, योगेश पाडवी आणि प्रियांका गावीत यांनी रेस्क्यू मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.
या मोहिमेत वनरक्षक वाहन चालक नईम मिर्झा यांच्यासह स्थानिक शेतकरी बालू साहेबराव कोळी, रोहित राजेंद्र कोळी, संदीप सतीश कोळी, मयूर कोळी, अभिजित कोळी, किशोर कोळी, अनिकेत कोळी तसेच वनसंरक्षक संस्थेच्या सदस्यांनीही मोलाचे सहकार्य केले.

रेस्क्यूनंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तो पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती वन विभागाने दिली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
चौकट : ग्रामस्थांची सजगता ठरली महत्त्वाची बिबट्याच्या उपस्थितीची माहिती वेळेत वन विभागाला मिळाल्याने रेस्क्यू मोहीम वेगाने राबविणे शक्य झाले. ग्रामस्थांनी दाखविलेली सतर्कता आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
