शिरपूर (प्रतिनिधी ) शिरपूर तालुक्यातील अर्थे बु. गावातील शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना शनिवारी १३ जून रोजी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, शेतीवरील आर्थिक ताणामुळेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
मयत शेतकऱ्याचे नाव दिगंबर अवधूत कुलकर्णी (वय ४४, रा. अर्थे बु., ता. शिरपूर) असे आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच गावचे माजी सरपंच साहेबराव पाटील तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने खाली उतरवून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय यांनी दिलेल्या खबरीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,पुढील तपास पोहेकॉ गिरासे करीत आहे.
दिगंबर कुलकर्णी हे शेतीसोबतच पूजाविधी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शेतीवरील कर्जबाजारीपणामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तथापि, आत्महत्येमागील नेमके कारण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
