शिरपूर : भगवान परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या भार्गव यात्रेचे शिरपूरमध्ये उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सकल ब्राह्मण समाजासाठी श्रद्धेचा विषय असलेली ही यात्रा अहिल्यानगर येथून प्रारंभ होऊन मध्य प्रदेशातील जानापाव या भगवान परशुरामांच्या जन्मभूमीकडे प्रस्थान करत आहे.
या यात्रेदरम्यान विविध शहरांमध्ये थांबे घेत समाजबांधवांशी संवाद साधला जात असून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. शिरपूर येथे राजस्थानी गौड ब्राह्मण समाज व विप्र फाउंडेशनच्या वतीने परशुराम रथाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष केतन पंडीत यांच्यासह विजय देशपांडे, अनंत कुलकर्णी, हर्षल पंडीत, किशोर दलाल, अतुल शुक्ल, किशोर पंडीत, मनीष शर्मा, बापू पाटील, बब्बू शर्मा, प्रशांत शर्मा आदी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल केतन पंडीत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भगवान परशुरामांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.