शिरपूर (प्रतिनिधी)तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या सरपंच व सदस्य पदांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रिया सोमवारी (दि. १३ एप्रिल) पूर्ण झाली. काही ठिकाणी चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत असताना, काही जागा बिनविरोध झाल्याचे चित्र समोर आले आहे.

जात वैधता, तीन अपत्य नियम, राजीनामा, अतिक्रमण व मृत्यू आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक होत आहे. दि. ७ एप्रिलपासून सुरू झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत अखेरच्या दिवसापर्यंत ४ सरपंच पदांसाठी एकूण १९ अर्ज दाखल झाले.
ग्रामपंचायतनिहाय पाहता, खर्दे बु. येथे ४, चांदसे-चांदसुर्या येथे ६, तऱ्हाड कसबे येथे ५, तर पनाखेड येथे ४ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. अजनाड, टेंभेपाडा, लौकी, तोंदे, मांजरोद, बुडकी, खर्दे खु.-पाथर्डे येथे प्रत्येकी १ अर्ज दाखल झाला आहे. भोईटी व उमर्दा येथे प्रत्येकी ३ अर्ज आले आहेत. मात्र निमझरी, वाघाडी व नांथे या ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही.
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण १७ पदांसाठी निवडणूक होत असून, त्यापैकी ७ सदस्य पदे बिनविरोध झाली आहेत. तसेच ४ सदस्य पदांसाठी कोणतेही नामनिर्देशन दाखल झालेले नाही. दरम्यान, २ ग्रामपंचायतींतील २ जागांसाठी एकूण ६ अर्ज दाखल झाल्याने तेथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून, १७ एप्रिल रोजी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.