शिरपूर : तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून भारतीय जनता पार्टी मार्फत शिरपूर प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली असून आ. काशिराम पावरा यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी वारा वादळासह पाऊस व गारपीटने शिरपूर शहरासह तालुक्यात हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असतांना अवकाळी पाऊस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे.तर अहिल्यापूर परिसरात तासभर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गावातील बैलजोडी मृत्यूमुखी पडली.
दरम्यान शुक्रवारी ३ एप्रिल रोजी शिरपूर तहसिलदारांना निवेदन देतेवेळी आ.काशिराम पावरा, संग्रामसिंग राजपूत,भरत पाटील,श्यामकांत ईशी, विरुपालसिंग राजपूत, बाळासाहेब पाटील,योगेंद्रसिंग सिसोदिया, खर्दे पाथर्डेचे सुनिल पाटील,पोलीस पाटील पंकज पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
तहसिलदारांनी निवेदनाची दखल घेऊन तलाठी व कृषी सहायकांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेत.
भारतीय हवामान विभागाने राज्यात विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.