शिरपूर :- तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासीबहुल बोराडी ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतीला १ कोटी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबई येथे होणार आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संवर्धन, नवीकरणीय ऊर्जा, शाश्वत विकास व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत बोराडी ग्रामपंचायतीने गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. पाच ते दहा हजार लोकसंख्या गटात ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंघे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनाचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे व कार्यालयांवर सौरऊर्जा पॅनल बसवून नेट मीटरिंगची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी शाळांचे डिजिटलीकरण, स्मार्ट टीव्ही व संगणक कक्ष उभारण्यात आले असून, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन उपक्रम राबविले जात आहेत.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.तुषार रंधे,सरपंच सुकदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.