शिरपूर : शिरपूर शहरातील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवात दुकाने लावण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या दंगलीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील एकूण १८ आरोपींपैकी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची पोलिसांनी मंगळवारी शहरातून दिंड काढली. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत ही कारवाई करण्यात आली.
यात्रोत्सव काळात दुकानांच्या जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासादरम्यान सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण व्हावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने संशयितांची शहरातून दिंड काढली.
विशेष म्हणजे यापूर्वी मागील यात्रोत्सवातही याच संशयितांची अशाच प्रकारे दिंड काढण्यात आली होती. वारंवार कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका कायम ठेवण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, दंगल व अनुचित प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून तपास अधिक गतीने सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.