संदीप जमादार
आनंद हा गाजलेला सिनेमा. त्यातला एक संवाद खूप भावस्पर्शी आहे… बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए! तपनभाई अशीच भव्य जिंदगी जगले. आजही त्यांचे नाव निघाले की हाताने वाजणाऱ्या टाळ्या आणि डोळ्यातील आठवणीतले अश्रू थांबत नाहीत..
मुंबईत वाढलेला आणि विदेशात शिकलेला हा राजकुमार एका आदिवासी तालुक्यात येईल, झपाटून काम करेल आणि इथल्या साध्याभोळ्या जनतेच्या हृदयावर राज्य करेल ही कल्पनाही कोणी केली नसती..अब्जाधीश मित्रांची साथसोबत सोडून तपनभाई शिरपूरला आले. इथल्या रस्त्यावरच्या माणसाशी नाळ जुळवते झाले. अफाट मित्रांचा आणि लोकांचा संग्रह केला. खिसा, चेकबुक आणि हात यांच्या माध्यमातून भरभरून मदत देत राहिले. स्पष्ट, आडपडदा न ठेवता बोलणे, अगदी विरोधक असला तरी त्याचे म्हणणे ऐकून घेणे आणि धडाडीने निर्णय घेणे अशा कार्यपद्धतीने त्यांनी युवा पिढीला वेड लावले. जिकडेतिकडे तपनभाई फॅन्स क्लब तयार झाले. गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव, सगळीकडे फक्त आणि फक्त तपन भाईंचा डंका वाजू लागला.
शिरपूर शहरापासून ते आदिवासी पाड्यापर्यंत तपनभाई सहज जाऊन भिडले. सभा गाजवल्या. माणसे जोडून घेतली आणि हा प्रवास खूप मोठा होईल असे वाटत असतानाच एका दुर्दैवी क्षणी ते आपल्याला सोडून निघून गेले. कदाचित दैवाला त्यांची अधिक गरज असावी…
अमरीशभाई आणि भूपेशभाई हे दुःख सोसून उभे राहिले. त्यांना थांबून चालणारे नाही. पण भावाची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झायड्स समूहाच्या संचालिका आणि तपन भाईंच्या भगिनी मेहा पटेल ज्या तडफेने पुढे आल्या, ते पाहिल्यास या परिवाराचे शिरपूर तालुक्यातील जनतेवर किती प्रेम आहे, ते लक्षात येते. दिवंगत भावाच्या वाढदिवशी त्यांनी गतवर्षी पाच चेक डॅम उभारणीस सुरुवात केली, शाळांना हायफाय स्वच्छतागृहे दिली. गुणवंत गरजूंना शिष्यवृत्तीच्या रूपात आर्थिक मदत दिली. आर्थिक दुर्बल महिलाना रोजगारासाठी पिठाची गिरणी, पाण्यासाठी वॉटर रोलर दिले. आज त्यांच्या दातृत्वातून मोतीबिंदू शिबीर, सायकल वाटप, शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याचे भूमिपूजन अशी कोट्यवधी रुपये खर्चाची पुण्यकार्ये होणार आहेत. तपन भाईंनी पाहिलेले विकासाचे स्वप्न आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा त्या कायम ठेवतील यात शंका नाही.