क्राईम ब्लास्ट ब्यूरो
युरिया व डीएपी खतांचा तुटवडा दूर करावा, अतिक्रमित वनजमिनीधारक शेतकर्यांना कर्जे मिळवून देण्यास सहकार्य करावे, स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर ग्राहकांना पावत्या देणे बंधनकारक करावे आदि मागण्यांसाठी बिरसा आर्मी व आदिवासी शेतकर्यांनी 14 जुलैला प्रांताधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकार्यांना निवेदन देऊन बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
बिरसा आर्मीचे प्रदेशाध्यक्ष मनोज पावरा व शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील युरिया, डीएपी 10:26:26 खतांची टंचाई दूर करावी, या खतांसोबत लिंकिंगच्या माध्यमातून दुय्यम खते घेण्याची सक्ती केली जात असून हा प्रकार बंद करावा, शासनाचे स्पष्ट आदेश असतांनाही अतिक्रमित वनजमिनीधारक शेतकर्यांना पीककर्जे देण्यास बँका टाळाटाळ करीत असून संबंधित अधिकार्यांना समज देण्यात यावी, स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर शिधापत्रिका धारकांना पावती न देण्याचे प्रकार सुरु असून अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करावेत, सात महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे, नव्या शिधापत्रिका मागणीनुसार द्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास बैलगाडी मोर्चा काढण्याचाही इशारा देण्यात आला.
निवेदन देतेवेळी मनोज पावरा, सुरेश पावरा, अशोक भिल, सरदार पावरा, काकड्या पावरा, कैलास पावरा, किस्मत पावरा, सुरेश ठाणसिंह पावरा, कैलास काकड्या पावरा आदि उपस्थित होते. युरियासंदर्भातील मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांना देण्यात आले.