संदीप जमादार
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
खानदेशातील विद्येचे माहेरघर अशी शिरपूरची ओळख आहे. सुमारे 45 हजारांवर विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र सरस्वतीच्या मंदिरांना म्हणजेच शाळांना गुटख्याचा वेढा पडल्याचे विदारक चित्रही याच शहरात आहे. हा फास कोण आणि कसा सोडविणार असा प्रश्न चिंताग्रस्त पालकांमधून विचारला जात आहे.
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी शाळेभोवती गुटखा विक्री थांबवण्यासाठी प्रयत्न केले म्हणून संबंधित गुटखा विक्रेत्यांनी त्यांना मारहाण केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने आता शाळांच्या एक किमी अंतराच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या फर्मानाची किती प्रमाणात अंमलबजावणी होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुळात हा आदेश मनोरंजक म्हणावा लागेल. राज्यात यापूर्वीच गुटखा बंदी आहे. आता शाळांच्या परिसरात गुटखा विक्री करू नये असा आदेश निघाला आहे. म्हणजे बंदी असूनही गुटखा विकला जातो हे सरकारला मान्य असावे. किंवा मग शाळांचा परिसर वगळून इतरत्र गुटखा विक्री केल्यास काही हरकत नाही असाही त्याचा सोयीस्कर अर्थ लावता येईल.
गुटखा बंदी केवळ कागदावर आहे हे नागडे सत्य आहे. हायवेवर पोलीस कंटेनर, ट्रक भरून गुटखा जप्त करतात, पण शहर आणि तालुक्याच्या प्रत्येक पान टपरीवर सहजच गुटखा मिळतो हे सर्वांना ठाऊक आहे. चोरट्या विक्रीमुळे शासनाचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडतो आहे आणि अपेक्षित गुटखा बंदी साधता येत नाही. मग या गुटखा बंदितून कोणाला फायदा झाला याचे मूल्यमापन एकदा करणे आवश्यक आहे.
शिरपूर शहर आणि तालुक्यातील शाळांबाबत काय परिस्थिती आहे ? 99 टक्के शाळांचा परिसर पान टपऱ्यानी वेढला गेला आहे. शहरात तर खूप वाईट परिस्थिती आहे. एकही शाळा पान टपरीपासून एक किमीच्या अंतरावर नाही. नगर परिषदेने अशा व्यवसायांना कोणत्या नियमाने परवाने दिले आहेत ते कळण्यास मार्ग नाही. स्टेशनरीच्या नावाने थाटलेल्या दुकानात सर्रास गुटखा विक्री होते. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांचे घोळके पान टपऱ्यावर उभे असतात. राज्याचे कोणतेही नियम, आदेश शिरपूरला लागू होत नाहीत का असा विचार करण्याइतपत परिस्थिती वाईट झाली आहे.
आमदार अमरीशभाई पटेल यांनी अत्यंत दूरदर्शी नियोजन करून शहराला राज्यात स्थान मिळवून दिले आहे. गुटख्याच्या विक्री केंद्रांची शालेय परिसरातून हकालपट्टी करण्याची कारवाई ते करण्यास यंत्रणेला भाग पाडतील का असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे.