क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील गरताड रस्त्यावर पाच मे रोजी खून केलेल्या अवस्थेत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला होता. थाळनेर पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वीपणे तपास करून खुनात सहभागी असलेल्या चार संशयितांना शिताफीने अटक केली. हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी थाळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर गरताड रस्त्यावर हॉटेल सनी गार्डन पुढे रुमालाने गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला होता. त्याच्याजवळ ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू नसल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली होती.
सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी मृताच्या कपड्यांची बारकाईने पाहणी करून त्यातून एक चुरगाळलेला कागद बाहेर काढला. त्यावर मोबाईल नंबर लिहिला होता. मात्र तो नंबर केवळ आठ अंकी होता. त्यामुळे शेवटचे दोन अंक सिरीयल प्रमाणे लावून पोलिसांनी तपास केला. त्यावेळी सदर नंबर मध्यप्रदेशातील असल्याचे आढळले. त्या नंबरचा मोबाईल वापरणाऱ्याकडे पोलीस जाऊन पोहोचले, तेव्हा मृत तरुण हा उमेश उर्फ राहुल केदार सिंग चव्हाण असून तो बडवानी जिल्ह्यातील राजपुर तालुक्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तो सध्या कामानिमित्त नरडाणा येथे राहत असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी नरडाणा गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार मे रोजी मृत उमेश एका युवकासोबत असल्याचे दिसून आले. त्यावरून पुढील तपास करत पोलीस आकाश कैलास पावरा याच्यापर्यंत पोहोचले. शिरपूर शहरातील निमझरी रस्त्यावरून त्याला अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून त्याच्यासह घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग पावरा, दिलीप कैलास पावरा व एक विधी संघर्षित बालक यांनी मिळून उमेशचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मागील काही दिवसांपूर्वी मृत उमेश याने विधी संघर्षित बालकाला मारहाण केली होती. तसेच गुड्डू पावरा याला नरडाणा येथे घरात जाऊन मारहाण केली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी कट रचून आकाश पावरा याला उमेशला शिरपूरपर्यंत आणण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे चार मे रोजी रात्री नऊला तो उमेशला घेऊन कालीपिली जीपने शिरपूर बस स्टॅन्ड पर्यंत आला. तिथून त्याला संशयित सनी गार्डन हॉटेलकडे घेऊन गेले. तेथे त्यांनी त्याला मारहाण करून रुमालाने त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
कुठलाही धागा दोरा हाती नसताना या जटील गुन्ह्याचा यशस्वीपणे उलगडा करून आरोपींना अटक केल्याबद्दल सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील व सहकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सुनील गोसावी यांनी कौतुक केले.