क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शहरात कानुबाईच्या उत्सवाला हजेरी लावून नाशिककडे परत जात असताना कार-ट्रॅक्टरच्या धडकेमुळे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर शहरातील रहिवासी दशरथ तथा नाना कोळी यांच्याकडे कानुबाईचा उत्सव आयोजित केला होता. त्याला हजर राहण्यासाठी त्यांनी बहीण मीना चव्हाण व मेहुणे संदीप चव्हाण यांना आग्रहाने शिरपूरला बोलावले. चव्हाण कुटुंबासह त्यांचा मित्र हितेश चौधरी देखील शिरपूरला आले. एक ऑगस्टला कानुबाईचे विसर्जन केल्यानंतर सर्वजण नाशिकला परत जाण्यासाठी निघाले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गव्हाणे फाट्याजवळ त्यांच्या कारणे उभ्या ट्रॅक्टरला भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात संदीप शिवाजी चव्हाण, मीना संदीप चव्हाण व हितेश चौधरी ठार झाले. त्यांची मुलगी जान्हवी हिचा धुळे येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. महामार्गाच्या दुरुस्तीचे काम करणारा पांडुरंग माळी हा सोनगीर येथील मजूरही अपघातात ठार झाला. कारने धडक दिलेले ट्रॅक्टर महामार्ग दुरुस्तीसाठी मजुरांना घेऊन आले असल्याचे कळते.

अपघाताचे दृश्य भयंकर होते कारच्या एअरबॅग उघडून देखील संबंधितांचा जीव वाचू शकला नाही. जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी स्वतःच्या कारमधून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील मृत चव्हाण दांपत्य नाशिक येथील उत्तम नगरमध्ये राहते तर मयत हितेश चौधरी म्हसरूळ येथील रहिवासी आहेत.