
शिरपूर (प्रतिनिधी) : वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सोमवारी शिरपूर शहरात अभिनव आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी बैलांशिवाय बैलगाडी स्वतःच्या खांद्यावर ओढत निषेध नोंदवला. तसेच हातगाडीवर घरगुती गॅस सिलेंडर ठेवून शहरातून मोर्चा काढण्यात आला.

इंधनाच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, भविष्यात पुन्हा बैलगाडीच्या युगात जावे लागेल, असा प्रतीकात्मक संदेश या आंदोलनातून देण्यात आला. आंदोलनामुळे शहरवासीयांचे लक्ष वेधले गेले.
धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या दरांवर नियंत्रण आणावे, शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, कृषिपंपांसाठी सलग १० ते १२ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, तापी नदीचे पाणी शेतीपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, छोटू पाटील, मंगेश पवार, राजू टेलर, सर्जेराव पाटील, गिरीश देसले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
