
शिरपूर | प्रतिनिधी /- शिरपूर तालुक्यातील सावळदा गावाजवळ तापी नदीपात्रात एका 26 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नदीत आणखी एक मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध घेणे सुरू आहे
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 6 जून रोजी सायंकाळी सावळदा गावाजवळील तापी नदीपात्रात दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत थाळनेर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने नदीतून एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याची ओळख अनिरुद्ध रवींद्र पाटील (वय 26, रा. तारणतारण जैन मंदिराजवळ, शिरपूर) अशी पटली आहे.
दरम्यान, नदीपात्रात आणखी एक मृतदेह दिसून आला होता. मात्र सायंकाळी अंधार झाल्याने तसेच तांत्रिक अडचणींमुळे तो बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवून दुसऱ्या मृतदेहाचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाहेर काढण्यात आलेला मृतदेह पुढील तपासणीसाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरपूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत.
