शिरपूर, प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व सीएनजीच्या सतत वाढणाऱ्या दरांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवारी शिरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन देऊन पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. त्याचाच एक भाग म्हणून शिरपूर येथे आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर धरणे देत शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदविला.
आंदोलनानंतर सादर करण्यात आलेल्या निवेदनात पेट्रोल, डिझेल, गॅस व सीएनजीच्या वाढत्या दरांचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून ट्रॅक्टर तसेच कृषी यंत्रसामग्री चालविणे शेतकऱ्यांसाठी परवडेनासे झाले आहे. यामुळे शेती उत्पादन खर्चात वाढ होऊन कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यात कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढीचे धोरण राबविल्याचा आरोप केला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खालावत असून घरगुती खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण झाले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस आणि सीएनजीचे वाढलेले दर तात्काळ मागे घेऊन पूर्वीचे दर लागू करावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. तसेच चार राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देशाची आर्थिक परिस्थिती समाधानकारक असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र सध्याची परिस्थिती त्या दाव्यांशी विसंगत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनात सीपीआय व किसान सभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
