थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर-भोरटेक रस्त्यावर भरधाव तीन चाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेर येथील ईश्वर निळकंठ कोळी (वय ४२) हे बुधवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास मोटरसायकलने भोरटेककडून थाळनेरकडे येत होते. त्याचवेळी मुडावद येथील महादेवाचे दर्शन घेऊन काही महिला GJ-21-V-6857 क्रमांकाच्या तीन चाकी वाहनातून होळनांथेच्या दिशेने परतत होत्या.
थाळनेर-भोरटेक मार्गावरील टी-पॉइंटजवळ तीन चाकी वाहन भरधाव वेगात येत असल्याचे लक्षात येताच ईश्वर कोळी यांनी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबविली. मात्र, तीन चाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहन मोटरसायकलवर पलटी झाल्याने ईश्वर कोळी हे वाहनाखाली दबले गेले.
घटनास्थळी उपस्थित महिलांनी व स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमी ईश्वर कोळी यांना वाहनाखालून बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर तीन चाकी वाहन चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.
मृत ईश्वर कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे थाळनेर परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय भाटेवाल करीत आहेत.
