
शिरपूर : सततच्या वीजखंडित आणि लोडसेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा संताप सोमवारी रात्री उफाळून आला. तोंदे, हिसाळे, तरडी, बभळाजसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी रात्री नऊच्या सुमारास बभळाज येथील महावितरण उपकेंद्र गाठत जोरदार घोषणाबाजी केली आणि शिरपूर-चोपडा मार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
सध्या परिसरात कापूस, टोमॅटो आणि भेंडी लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशावेळी शेतीसाठी सात तास वीज मिळत असली तरी त्यामध्येही वारंवार तीन ते चार तास लोडशेडिंग होत असल्याने पिके करपण्याची वेळ आली आहे. “एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे वीजेचा खेळखंडोबा,” अशा शब्दांत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणचे उपअभियंता किशोर पाटील आणि कनिष्ठ अभियंता चेतन पाटील घटनास्थळी दाखल झाले. संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.
दरम्यान, थाळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय हर्षल पाटील हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलकांची समजूत काढली. विशेष म्हणजे, आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी शेतकरी स्वतः रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
