
शिरपूर : भारत सरकारच्या आगामी जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यंदाच्या जनगणनेत नागरिकांसाठी “स्वयं-नोंदणी” (Self Enumeration) ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती नोंदविता येणार आहे.
तहसीलदार तथा चार्ज अधिकारी महेंद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ऑनलाइन स्वयं-नोंदणी प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती अचूक व सत्य स्वरूपात भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून जनगणना प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणतीही चुकीची अथवा अपूर्ण माहिती न भरता जबाबदारीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
“देशाच्या विकासासाठी अचूक जनगणना अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयं-नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी,” असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.
