शिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे रस्त्यावर रविवारी दुपारी प्रवासी रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथून प्रवासी घेऊन बाळदे येथे जात असलेली (एमएच १८ डीएल २६५७) क्रमांकाची रिक्षा दुपारी चारच्या सुमारास साकवद गावाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे रिक्षा रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला.
या अपघातात सुदाम आसाराम भिल हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ संतोष नारायण तिरमले व इतर प्रवाशांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
