शिरपूर : मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २२ एप्रिल) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. आयशर मालवाहू वाहनाने उभ्या असलेल्या खाजगी प्रवासी वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली.

या अपघातात मनीषा राजेंद्र पाटील (वय ४६, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) व बंटी किशन जाधव (वय ३२, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहून हिसाळे गावाकडे जाणारे खाजगी प्रवासी वाहन महामार्गावरील हॉटेल आरतीसमोर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डी.डी. ०१ जी ९७५२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनातील मनीषा पाटील व बंटी जाधव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बस्सी यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मनीषा पाटील या लग्नकार्याच्या निमित्ताने हिसाळे येथे आल्या होत्या. तब्येत बिघडल्याने उपचारासाठी शिरपूरला येऊन परत जात असताना हा अपघात घडला. त्या नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या भगिनी होत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.