शिरपूर तालुक्यात जानेवारी महिन्यात झालेल्या गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिरपूर फर्स्ट’ व शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, जानेवारीत झालेल्या गारपीटीत अनेक शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले होते. पंचनाम्यांची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झालेली नाही. तसेच थकीत पिक विम्याची रक्कमही त्वरित देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, २ एप्रिल रोजी शिरपूर तालुक्यातील सुमारे ३० गावांमध्ये अवकाळी पावसामुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांनाही वाढीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना कार्यकर्त्यांनी मका, केळी आणि कांदा घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सात दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास शिरपूर तालुका व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिरपूर फर्स्ट व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.