शिरपूर : तालुक्यातील पहिली सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या दि शिरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग व्यवसाय परवाना अखेर रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) रद्द केला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या हजारो ठेवीदारांमध्ये आणि भागधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे आर्थिक भविष्य अनिश्चिततेत सापडले आहे.
सुमारे ७८ वर्षांची परंपरा असलेली ही बँक गेल्या काही वर्षांत गैरव्यवहार आणि वाढत्या थकबाकीमुळे डबघाईला आली होती. बँकेचे साडेसहा हजारांहून अधिक सभासद असून १९८६ साली मिळालेला बँकिंग परवाना तब्बल ४० वर्षांनंतर रद्द करण्यात आला आहे. २ एप्रिल रोजी आरबीआयने आदेश काढून बँकेचा परवाना रद्द करण्याची घोषणा केली.
यापूर्वीच २०२४ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. असुरक्षित कर्जवाटप आणि त्यांची वेळेत वसुली न झाल्याने थकबाकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकांकडून कर्जवसुलीचे प्रयत्न सुरू होते, मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही.
आरबीआयच्या अहवालानुसार, बँकिंग नियमन कायद्याच्या आवश्यक अटींचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली. सध्याच्या आर्थिक स्थितीत बँक ठेवीदारांची पूर्ण रक्कम परत करण्यास सक्षम नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बँकेला पुढे कामकाज करण्यास परवानगी दिल्यास जनहितावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने नमूद केले.
दरम्यान, बँकेवर लवकरच अवसायकाची (Liquidator) नियुक्ती केली जाणार असून पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. या घडामोडींमुळे शिरपूर तालुक्यातील सहकारी क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.