शिरपूर : अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलने राष्ट्रीय पातळीवर अभिमानास्पद कामगिरी करत ‘नॅशनल यंग ऑथर्स फेअर (एन.वाय.ए.एफ) २०२५–२६ मध्ये भारतातील टॉप २० साहित्यिक नेतृत्व करणाऱ्या शाळांमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
दिल्ली गुरुग्राम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नॅशनल अवॉर्ड्स अँड एक्झिबिशन कार्यक्रमात शाळेला सन्मान चिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा ब्रिबुक्स या व्यासपीठावर आयोजित करण्यात आली होती.
शाळेच्या या यशामागे सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवास आहे. सुरुवातीला सिटी लेव्हल लिटररी लीडरशिप अवॉर्ड मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर राज्य स्तरावरही शाळेने आपली छाप पाडली आणि अखेरीस राष्ट्रीय स्तरावर चतुर्थ क्रमांक मिळवून मोठे यश संपादन केले.
या यशाची विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी तब्बल ८१५ पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, लेखनकौशल्य आणि चिकाटी याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
शाळेमध्ये ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन (एल.एस.आर.डब्ल्यू.) या कौशल्यांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना कल्पना सुचवण्यापासून लेखन, संपादन आणि अंतिम प्रकाशनापर्यंत संपूर्ण प्रक्रिया अनुभवण्याची संधी देण्यात आली, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष लेखक होण्याचा मौल्यवान अनुभव मिळाला.
या उपक्रमाला मुख्याध्यापिका स्मिता उगले यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व लाभले. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण संवादक आणि उत्कृष्ट लेखक घडविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेत सशक्त साहित्यिक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच इंग्रजी विषयाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला अधिक बळ मिळाले.
शाळेची ही राष्ट्रीय कामगिरी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्याच्या आणि त्यांच्या आवाजाला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेशा पटेल, कोषाध्यक्ष बबनराव अग्रवाल, संचालक अतुल भंडारी, संचालक विजय भंडारी, सर्व संचालक, प्राचार्या स्मिता उगले, सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले.
संपूर्ण शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकवृंद यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.