शिरपूर :- तालुक्यातील तऱ्हाडी येथे खळ्यांना अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा पूर्णपणे जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तऱ्हाडी येथे खळ्यांमध्ये साठवून ठेवलेल्या कडबा, सरकी व इतर चाऱ्याला अचानक आग लागली. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढलेला वाऱ्याचा वेग यामुळे काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या भडक्यात संपूर्ण खळे वेढले गेले आणि मोठ्या प्रमाणावर चारा जळून खाक झाला.या आगीत रविंद्र विनायक पाटील व सुरेश एकनाथ डामरे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभरासाठी साठवलेला जनावरांचा चारा नष्ट झाल्याने भर उन्हाळ्यात जनावरांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.