शिरपूर : तालुक्यातील अहिल्यापूर शिवारात वीज कोसळून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली. या घटनेत पळासनेर येथील शेतकरी निलेश केवलसिंग राजपूत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पळासनेर येथील शेतकरी निलेश राजपूत यांचे अहिल्यापूर शिवारात शेतजमीन असून गोवंश जनावरे बांधलेली असतात.2 एप्रिल रोजी झालेल्या विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसात शेतात अचानक वीज कोसळली. यात शेतीकामासाठी अत्यावश्यक असलेली बैलजोडी जागीच दगावली. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने संबंधित शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. बैलजोडी हीच शेतीची मुख्य ताकद असल्याने या नुकसानीमुळे त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होणार आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासन, पशुवैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाशी संपर्क साधून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचा त्वरित पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उघड्यावर आलेल्या शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.