मुंबई/धुळे : राज्यातील विविध आदिवासी समाजांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय व हक्कांच्या मागणीसाठी २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समस्त महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी, ढोर/टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी आदी जमातींच्या बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
उन्हाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्या, हक्कांचे संरक्षण, आरक्षण व विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यात आले. “चलो मुंबई… चलो मुंबई” या घोषणेसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान परिसर दुमदुमून टाकला.
मोर्चादरम्यान जय आदिवासी, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय तानाजी, जय झलकारी, जय संविधान अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
या विराट मोर्चाच्या माध्यमातून शासनाने आदिवासी समाजाच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.