शिरपूर : येथील एस. व्ही. के. एम. संचलित केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररी, शिरपूर तर्फे शिरपूर तालुका व शहरातील विद्यार्थ्यांसाठी “एकाग्रता : डिजिटल युगातील यशाची गुरुकिल्ली” या विषयावर डिजिटल वेलनेस व फोकस तज्ज्ञ, लाईफ कोच, आंतरराष्ट्रीय वक्ते व लेखक ज्ञानेश्वर नेरकर यांची कार्यशाळा राजगोपाल भंडारी हॉल, आर.सी.पटेल मेन बिल्डिंग येथे ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.
विशेष म्हणजे हे सर्व आयोजन विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजित करण्यात आले होते. शिरपूर नगरीतील युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररी तर्फे विविध उपक्रम नियमितपणे राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास श्री विलेपार्ले केळवणी मंडळ व आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पाहुण्यांच्या सत्काराने झाली. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर नेरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक अतुल भंडारी, अकॅडमिक इन्चार्ज, पी.व्ही.पाटील, आर.सी.पटेल फार्मसीचे उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, प्राचार्य डॉ. अमोल परब, केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररीचे उपग्रंथपाल अश्विन अमृतकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ज्ञानेश्वर नेरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, आमदार अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यात जी शैक्षणिक क्रांती घडवून आणली याचे विशेष कौतुक केले पाहिजे. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे. शिरपूरचे विद्यार्थी खरंच खूप भाग्यवान आहेत असेही ते म्हणाले. सर्व प्रथम त्यांनी एकाग्रता म्हणजे काय हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. कुठल्याही परीक्षेत अपेक्षित यश मिळवण्यासाठी एकाग्रता कशी महत्वाची आहे या बद्दल भाष्य केले. त्यानंतर त्यांनी एकाग्रता कमी होण्याची ६ प्रमुख कारणे सांगितली. कार्याप्रती स्वारस्य नसणे, चुकीच्या सवयी, इतरांशी सतत तुलना करणे, जबाबदारी नाकारणे, नकारात्मक विचारातून हिम्मत खचून जाणे, कुठल्याही कार्याचा हेतू स्पष्ट नसणे. या प्रमुख सहा मुद्द्यावर त्यांनी अनेक उदाहरणे व वर्तमानातील घटना व विविध दाखले देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यानधारणा, योगासने, वाचन, नियमित व्यायाम आणि मोबाइलचा योग्य प्रमाणात वापर हे प्रभावी उपाय आपली एकाग्रता वाढविण्यास मदत करेल या बद्दल मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद यांनी एकाग्रतेचा आपल्या जीवनात कसा अवलंब केला यासाठी त्यांच्या जीवनातील काही प्रसंग त्यांनी सांगितले. जीवनातील कुठलेही मोठे ध्येय एकाग्रतेने व सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास अशक्य नाही. आपला मेंदू एका वेळेस एकच कार्य करू शकते परंतु युवा पिढी सोशल मीडियाचा अतिवापरामुळे आपल्या मेंदूची क्षमता कमी करून आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेत आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात व रात्री झोपतांना डिजिटल साधनांपासून दूर राहून तो वेळ चांगली पुस्तके वाचण्यात घालवावा. प्रत्येकाने वाचावे अशा पुस्तकांची नावे त्यांनी सांगितली. आपली खरी स्पर्धा हि आपल्या स्वतःशीच आहे, इतरांशी तुलना करणे चुकीचे आहे, आपले ध्येय निश्चित करा, मेहनत आणि जिद्द यांचा समतोल एकाग्रताशी जोडून यशाची प्राप्ती करा असा मूलमंत्र त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील विविध प्रश्न आणि शंका विचारले, त्यांचे निरसन नेरकर यांनी योग्य प्रकारे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अश्विन अमृतकर यांनी लायब्ररीची संपूर्ण माहिती देत कार्यक्रमाच्या हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन सेंट्रल लायब्ररीची सभासद प्रियंका रणदिवे हिने तर आभार प्रदर्शन ग्रंथालय सहाय्यक तुषार मारवाडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक पाटील, मनोज गायकवाड, वैशाली मराठे, तुषार मारवाडी यांनी प्रयत्न केले.