शिरपूर : किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्व भरती प्रशिक्षण केंद्राने स्थापनेनंतर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रातील तीन प्रशिक्षणार्थी युवकांची नुकतीच SSC GDदलांतर्गत ITBP (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) मध्ये कॉन्स्टेबल पदी निवड झाली असून, या यशामुळे शिरपूर परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या केंद्रातील विशाल देवबा माळी, चेतन आत्माराम जाधव आणि सागर सुकलाल निकवाडे या तीन युवकांनी अत्यंत कठीण शारीरिक व लेखी परीक्षा यशस्वीरीत्या पार करत भारतीय सीमा सुरक्षा दलात आपले स्थान निश्चित केले आहे. या यशस्वी जवानांचा तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचा संस्थेच्या आवारात जंगी सत्कार सोहळा पार पडला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते नवनियुक्त जवानांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. तुषार रंधे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आनंद व्यक्त केला. यशस्वी उमेदवारांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, नियमित सराव तसेच प्रशिक्षक सागर कोळी व विजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाला दिले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशाताई रंधे, संचालक मंडळातील सदस्य, प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, समन्वयक सागर वाघ तसेच क्रीडा सल्लागार डॉ. लिंबाजी प्रताळे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यशस्वी जवानांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या