क्राइम ब्लास्ट ब्यूरो
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने मृत्यूमुखी पडलेले भारतीय सैन्य दलातील हवालदार महेश युवराज सोनवणे यांच्या पार्थिवावर 7 जूनला शिरपूरमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार प्रसंगी सोनवणे यांच्या पत्नी ओजस्विता सोनवणे यांनी पतीच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहताना महेश सोनवणे अमर रहे अशी घोषणा दिली. त्यावेळी सर्वांच्या अंगावर रोमांच व डोळ्यात अश्रू आले. डीवायएसपी सुनील गोसावी, निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सैनिक कल्याण अधिकारी, यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. धुळे येथील विशेष पोलिस पथकाने हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.
महेश सोनवणे चोपडा तालुक्यातील मूळ रहिवासी असून सध्या शिरपूरमध्ये राहत होते. शहरातील करवंद नाका येथील बालाजी नगरमध्ये त्यांचे घर आहे. मध्यप्रदेशातील महू येथील लष्करी छावणीत हवालदार म्हणून ते नियुक्त होते. सहा जूनला दुचाकीने घरी परत येत असताना त्यांना दुपारी बाराला कंटेनरने धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, माजी सैनिक संघटना, एनसीसीचे विद्यार्थी आदि उपस्थित होते. शिरपूरच्या अमरधाममध्ये विविध स्तरातील नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांनी वीर जवान तुझे सलाम, महेश सोनवणे अमर रहे अशा घोषणा दिल्या.