क्राइम ब्लास्ट ब्यूरो
व्याजाच्या दुष्टचक्रात अडकल्याने आत्महत्या केलेल्या शिरपूरच्या विश्वजीत राठोड या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणात अखेर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने घेतलेले पैसे व्याजासह परत करावे या कारणावरुन वारंवार धमकावल्याने त्याने आत्महत्या केल्याचे विश्वजीतच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात शिक्षक असलेले विनोद गोपीनाथ राठोड यांचा मुलगा विश्वजीत राठोड (वय 17) याने 26 जानेवारीला दुपारी सावळदे येथील पुलावरुन तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. व्याजाच्या दुष्टचक्रात अडकल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याच्या वडिलांनी अंत्यविधी व त्यानंतरचे विधी आटोपून थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
संशयित भाग्येश शेखर भावसार, शेखर उर्फ विश्वास भावसार व भाग्येशची आई (तिघे रा.सुयश हॉस्पिटलमागे, करवंद नाका) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून विश्वजीतने 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. संशयितांनी त्या रकमेच्या व्याजावर व्याज लावले होते. ती रक्कम व्याजासह परत करावी अशा कारणावरुन तिघेही त्याला धमकावत होते. त्यांच्याकडून होणार्या छळामुळे विश्वजीतने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ए.एस.आगरकर तपास करीत आहेत.