क्राइम ब्लास्ट ब्यूरो
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदरच आहे. पण गायरान जमिनीवर संसार थाटलेल्या हजारो लोकांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न सोडवितांना प्रशासनाने अतिक्रमणधारकांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मार्ग काढावा अशी मागणी आमदार काशीराम पावरा यांनी प्रशासनाकडे केली.
तालुक्यातील सात गावांमधील गायरान जमिनीवर राहणार्या 1200 कुटुंबांना अतिक्रमणात असल्याने घरे काढून घ्यावीत अशा नोटीसा जिल्हाधिकार्यांनी बजावल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा यासाठी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील व अन्य लोकप्रतिनिधींनी 21 नोव्हेंबरला प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना निवेदन दिले. निवेदन देतेवेळी आ.पावरा, देवेंद्र पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, यतीश सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर माळी, मांडळचे ज्येष्ठ नेते भटू माळी, सुनिल सोनवणे, ताजपुरीचे सरपंच हेमंत सनेर, अजंदेचे सरपंच राजेंद्र पाटील, कळमसरे येथील रवींद्र राजपूत, बलकुवे येथील प्रदीप चव्हाण, मांडळच्या उपसरपंच अक्काबाई भिल, छगन माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.