अपघाताचा भयंकर व्हिडीओ बघा !
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
नाशिक येथे 8 ऑक्टोबरच्या पहाटे अपघातानंतर लक्झरी बस पेटून 12 प्रवासी ठार झाले. बसमधील वायरलूम पेटल्याने बस जळाल्याचे कारण समोर येत असून वाहनांमधील नियमबाह्य बदलांकडे (modification) आरटीओ अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्यानेच ही वेळ ओढवल्याचा आरोप होत आहे.
बसेसमध्ये आकर्षक लायटिंग करण्यासाठी वायरलूममध्ये बदल केले जातात. त्यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे आगीचा मोठा धोका असतो. मात्र त्याकडे आरटीओ लक्ष देत नाहीत. दरमहा ट्रॅव्हल्समालकांकडून होणाऱ्या प्राप्तीच्या मोबदल्यात अशा बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे.
खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेसची संख्या खूप मोठी आहे. तेथून मिळणाऱ्या बेकायदा महसुलाच्या मोबदल्यात मोठे गैरप्रकार घडत आहेत. एकाच नंबरच्या दोन तीन बसेस चालतात. त्यांच्यामध्ये फायर फायटरचे सिलेंडर नसतात. दर्शनी काचेवर मनमानी पद्धतीने रेडियम लावलेले असते. एकाच चालकाला प्रवासाचा मोठा पल्ला दिला जातो. सुरक्षाविषयक कोणत्याच नियमांचे पालन केले जात नाही. अनेक बसेस पासिंगची मुदत संपल्याने मुदतबाह्य झाल्या असूनही रस्त्यावर धावत आहेत. आठ ते दहा वर्षे मुदत असलेल्या बसेस 25-30 वर्षे वापरल्या जाताना दिसतात. सण-उत्सवाच्या काळात मनमानी भाडे आकारणी करून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जाते. या सर्व गैरप्रकारांना आरटीओ अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचा आरोप होत आहे. सर्व खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेसची कसून तपासणी करावी, नियमबाह्य बदल आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, सुरक्षा नियमांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

असा झाला अपघात !
पहाटे झोपेत असलेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातला. काही कळण्याच्या आतच आगीत होरपळून 12 प्रवासी मृत्युमुखी पडले. हा अपघात आठ ऑक्टोबरला पहाटे पाचला नाशिक येथे औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरचीसमोर घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,यवतमाळकडून मुंबईकडे निघालेली चिंतामणी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस एका ट्रेलरला धडकली. अपघातानंतर बसने पेट घेतला. पहाटे झोपेत असलेल्या प्रवाशांना काय घडले ते कळण्याच्या आत आग भडकली. या दुर्घटनेत 12 प्रवासी होरपळून मरण पावले. 30 प्रवासी गंभीर भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातलगांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करून जखमींवर योग्य उपचाराचे निर्देश दिले आहेत.