क्राईम ब्लास्ट ब्यूरो
सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ एक अफवाच असून, अशा प्रकारची घटना धुळे किंवा शेजारच्या जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.

22 सप्टेंबरला एसपी पाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना धुळे जिल्ह्यात किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नसल्याची माहितीही त्यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार 18 वर्षाआतील मुले-मुली बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी डीवायएसपी दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख उपस्थित होते.