क्राईम ब्लास्ट ब्यूरो
मुलीला न्याय मिळावा म्हणून बापाने तिचा मृतदेह तब्बल 42 दिवस मिठात पुरून ठेवला. सामूहिक अत्याचार करून तिचा खून झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला असून पोलिसांनी पुन्हा मृतदेहाचे पोस्टमार्टेम करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहितेला वावी (ता. धडगाव) येथील संशयितांनी एक ऑगस्ट रोजी गाडीवर बसवून पळवून नेले होते. त्यानंतर पीडीतेने तिच्या नातलगांना संशयित रणजीत ठाकरे व इतर चार जणांनी अत्याचार केला असून ते मला मारून टाकतील असा संदेश पाठवला होता. त्यानंतर तिचे कुटुंबीय तपास करत वावी येथे गेले असता आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितल्यानंतरही पोलिसांनी लक्ष दिले नाही, त्या दृष्टीने पोस्टमार्टममध्ये कोणतीही तपासणी केलेली नाही, आंब्याचे झाड उंच असून विवाहिता तिथे कशी चढू शकेल याकडेही लक्ष देण्यात आले नाही असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. तसेच तिच्या मृत्यूपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्याबाबतही पोलिसांनी दखल घेतलेली नाही असे संबंधितांचे म्हणणे आहे.
पोस्टमार्टमनंतर तिचा मृतदेह कुटुंबाकडे अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला. मात्र तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा निर्धार करत तिच्या वडिलांनी घराशेजारच्या शेतात खड्डा करून मुलीचा मृतदेह मिठामध्ये पुरून ठेवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून संबंधितांनी कैफियत मांडली. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन करावे अशा सूचना पोलिसांना दिल्या. संशयित रणजीत ठाकरे व अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ माजली आहे.