क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळ कुऱ्हाडीने घाव घालून महिलेचा निघृण खून केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे.
दहिवद गावामागे डी.आर.कॉटन फॅक्टरीजवळ असलेल्या शेतात 14 ऑगस्टला सकाळी सुमारे 22 वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी थाळनेर पोलीस ठाण्याला माहिती दिली. थाळनेरचे सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे व सहकारी पंचनाम्यासाठी तातडीने दाखल झाले. पंचनाम्याचे काम सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार सदर शेत डांगरी येथील रहिवासी जयवंत पाटील यांच्या मालकीचे असून त्यांच्या शेतात पंधरा दिवसांपूर्वीच रखवालदारीच्या कामासाठी जोडपे आले होते. त्या जोडप्यातील महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. उभयतांना साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. प्रथमदर्शनी माहितीनुसार, घरगुती वादातूनच पतीने पत्नीवर कुऱ्हाडीचे वार केल्याचे कळते. खून केल्यानंतर संशयित पती घटनास्थळीच बसून राहिला. पंचनामा केल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल असे पोलिसांनी सांगितले.