क्राईम ब्लास्ट ब्यूरो
कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने निराधार झालेल्या महिलेने पोटची मुले विकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच तिला ताब्यात घेतले. मुलांना उपाशी पाहू शकत नसल्यामुळे विकून टाकायचे होते असे महिलेने पोलिसांना सांगितले.
अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला काही मुलांची विक्री करीत असल्याची माहिती अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस कर्मचारी नाजिमा पिंजारी, दीपक माळी, रवींद्र पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी संबंधित महिलेला गाठून तिची चौकशी केली.
तिचे नाव हिराबाई देवा गायकवाड (वय 40) असून सध्या बेघर अवस्थेत भटकत असल्याचे सांगितले. तिच्यासोबत तीन मुली व चार मुले होती. त्यांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर सर्व मुले त्या महिलेची अपत्ये असून, तिच्या पतीचा कोरोना काळात ‘कोविड’ ने मृत्यू झाला असल्याने तिच्याकडे उपजीविकेसाठी पुरेसे साधन नव्हते. त्यामुळे ती तिच्या मुलांना इच्छुक लोकांना विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले.
मुलांना विकणे बेकायदेशीर असल्याचे सांगून तिला समज देण्यात आली. ती मुलांना विकून टाकण्याची शक्यता असल्याने तीन मुली व चार मुले याना संरक्षणासाठी बालसुधारगृहात रवाना करण्यात आले. पोलिस निरीक्षक हिरे, उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस कर्मचारी नाजिमा पिंजारी, दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी ही कार्यवाही केली.