तीन मुलांच्या हत्येच्या आरोपात
निर्दोष सुटलेल्या बापाची आत्महत्या
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
पोटच्या तीन मुलांचा खून केल्याच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या बापाने घरी गेल्यावर दुसऱ्याच दिवशी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत धोतर्डी येथे घडली.
विष्णू दशरथ इंगळे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील धोतर्डी गावात १० मे २०१८ रोजी विष पाजून पोटच्या तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयात झाली. सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. कारागृहातून सुटताच इंगळे याने आत्महत्या केली.
अशी होती पार्श्वभूमी
विष्णू इंगळे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने नैराश्यातून त्यांनी मुले अजय इंगळे (वय 17), मनोज इंगळे (वय 15) आणि मुलगी शिवानी (वय 12) यांना विष पाजले. ते बेशुद्ध झाल्यावर वरवंट्याने डोके ठेचून त्यांची निर्घृण हत्या केली असल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आरोपी निकाल लागेपर्यंत कारागृहात होता.