क्राईम ब्लास्ट ब्यूरो
वकिलाच्या दारासमोर त्याच्या पत्नीचे नाव लिहिलेली व सुया टोचलेली बाहुली, कणकेचा गोळा टाकून अघोरी विधी केल्याचा प्रकार नुकताच घडला. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पाच जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील शिवाजीनगरातील दाळफळ भागात हा प्रकार घडला. तेथे जिल्हा न्यायालयातील वकील अॅड.केदार भुसारी राहतात. 28 जूनला त्यांची पत्नी अंजली पतीला डबा देण्यासाठी कोर्टात गेली होती. (त्या दिवशी अमावास्या होती). तेथून परतल्यावर त्यांना घराच्या दाराजवळ कणकेचा गोळा, त्यावर हळद, कुंकू वाहिलेली बाहुली आढळली. बाहुलीवर पिवळ्या अक्षरात अंजली असे लिहून पिवळ्या फुल्या मारुन सुया टोचल्या होत्या. काळ्या दोर्यात लाल मिरच्या बांधल्या होत्या. हा अघोरी विधी पाहून अंजली भुसारी यांचा थरकाप झाला. त्यांनी पतीला फोन करुन बोलावून घेत हा प्रकार दाखवला.
शेजार्यांवर संशय : अॅड.भुसारी यांच्या वडिलांनी दिलेली घराशेजारील जागा प्रकाश व्यास, ललिता व्यास, सुशील पंडीत, विद्या पुरोहित, गौरीलाल पुरोहित 40 वर्षापासून कब्जात राखून आहेत. त्यांच्याविरोधात दाखल दिवाणी दाव्यात भुसारी यांच्या बाजूने 2017 मध्ये निकाल लागला. त्याचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी हा अघोरी विधी केल्याचा संशय आहे. यापूर्वी भुसारी यांच्या घराच्या दारावर केसांची बट, सोबत हळद कुंकू टाकणे, वाळत घातलेल्या कपड्यांवर रक्त टाकणे असे प्रकार घडले आहेत.