क्राईम ब्लास्ट ब्यूरो
लग्न होऊन महिनादेखील उलटला नाही तोच विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शिरपूर तालुक्यातील दोंदवाडीपाडा येथे घडली होती. तिच्या माहेरील लोकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.
मनिषा तोताराम पावरा या 26 वर्षीय विवाहितेने 16 जूनला सायंकाळी दोंदवाडीपाडा येथे सासरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिचे माहेर न्यू बोराडी येथील आहे. नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या मनिषाचा विवाह 22 मेस झाला होता. लग्नाला महिना उलटण्याच्या आतच तिला जगणे असह्य का वाटू लागले याबाबत चर्चा सुरू होती.
सुदाम काना पावरा (रा.न्यू बोराडी) यांनी 20 जूनला सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या घटनेचे गूढ उलगडले. लग्नानंतर मनिषाने शेतात कामाला जावे अशी तिच्या सासरच्या लोकांची अपेक्षा होती. मात्र तिला नोकरी करावयाची असल्याने तिने नकार दिला. या कारणावरून तिचा पती दारू पिऊन तिला मारहाण करीत होता तर घरातील इतर लोक टोमणे मारून मानसिक त्रास देत होते. 27 जूनपासून हा छळ सुरू होता. अखेर त्रास असह्य होऊन तिने 16 जूनला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या फिर्यादीवरून पती तोताराम पावरा, सासरा मोतीराम पावरा, सासू शियानीबाई, दीर शांतीराम, दिराणी आशाबाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसआय भिकाजी पाटील तपास करीत आहेत.