
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथे अज्ञात समाजकंटकांनी ग्रामदैवत श्री सतीदेवी यात्रेच्या मानाच्या रथाला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी रथाच्या तळाच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून दोषींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बोराडी ही शिरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून ग्रामविकास विभागाच्या विविध अभियानांमध्ये गावाने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सुशोभीकरण आणि विकासकामांमुळे बोराडीची जिल्हाभरात ओळख निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून गावातील सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करून समाजकंटकांकडून उपद्रव सुरू असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
ग्रामदैवत श्री सतीदेवीच्या यात्रेचा मानाचा रथ गावाजवळील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत ठेवण्यात येतो. पूर्वी या ठिकाणी कर्मचारी वास्तव्यास असल्याने परिसर सुरक्षित होता. सध्या कर्मचारी नसल्यामुळे येथे समाजकंटक आणि व्यसनींचा मुक्त वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळी रथाच्या तळाचा भाग पेटल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. मात्र, रथाच्या तळाच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. धार्मिक श्रद्धास्थानाला लक्ष्य करून केलेला हा प्रकार गंभीर असून पोलिसांनी याची सखोल चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, बोराडीतील सुशोभीकरणाच्या कामांनाही समाजकंटकांनी लक्ष्य केले आहे. फार्मसी महाविद्यालयासमोरील दुभाजकांवरील लोखंडी सळ्या चोरीस गेल्या असून पथदिव्यांची तोडफोड करण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. गावातील विकासकामांना विरोध करणाऱ्या काही विशिष्ट व्यक्तींकडूनच हे प्रकार घडवून आणले जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
