शिरपूर | प्रतिनिधी- राज्यात दहावीच्या निकालानंतर सर्वत्र आनंदोत्सव, पेढेवाटप आणि जल्लोषाचे वातावरण असताना शिरपूर तालुक्यातील होळनांथे गाव मात्र एका वेदनादायी आठवणीने हेलावून गेले आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी कुलरचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या आर. सी. पटेल विद्यालयाच्या विद्यार्थी चि. हर्षल विनोद मराठे याने एसएससी परीक्षेत तब्बल ९३ टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. मात्र स्वतःच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी हर्षल आज या जगात नसल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दहावीच्या निकालात हर्षलचे नाव गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत झळकताच शाळा परिसरासह गावात भावनिक वातावरण निर्माण झाले. “आज हर्षल असता तर आनंदाने नाचला असता,” अशा शब्दांत मित्र, शिक्षक आणि ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावरही हर्षलच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
आर. सी. पटेल विद्यालयाचा यंदा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे आनंदाचे वातावरण आहे. मात्र या यशात हर्षलची अनुपस्थिती प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. निकालात चमकदार यश मिळवूनही स्वतःच्या डोळ्यांनी तो क्षण पाहता आला नाही, ही वेदना शिक्षक आणि कुटुंबीयांना अस्वस्थ करून गेली आहे.
अभ्यासू, शांत आणि मेहनती स्वभावामुळे हर्षल शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने अभ्यास करून त्याने मिळवलेले ९३ टक्के गुण हे त्याच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे प्रतीक असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
