
शिरपूर, ता. ९ : येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘राजगोपाल भंडारी हॉल’ येथे झालेल्या या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेषा पटेल, खजिनदार बबनलाल अग्रवाल, संचालक अतुल भंडारी, विजय भंडारी, अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील, विविध शाखांचे प्राचार्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात संकुलातील २१ शाखांचा निकाल शंभर टक्के लागला. संस्थेतील १,९०८ विद्यार्थ्यांपैकी १,९०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९९.९० टक्के आहे. त्यापैकी ९३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ८६ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक, तर ८५० विद्यार्थ्यांना ९० ते ९४ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले. १,८७८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयातील जान्हवी कैलास सोनवणे हिने ९८.६० टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम, तर धुळे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला.
उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरून परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या उच्च शिक्षणाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंपी यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
