शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी शिवारात उभ्या असलेल्या वाहनातून बॅग चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीतील एका आरोपीला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सांगवी गावाजवळील देवमोगरा चहा हॉटेलसमोर फिर्यादीची इनोव्हा (एमएच ४१ एके ०१०१) उभी होती. या वाहनातून अज्ञात चोरट्यांनी बॅग लंपास केली. बॅगेत ५५ हजार रुपये रोख, विविध बँकांचे एटीएम व डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रे होती.या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील मनावर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार कल्याण जगदीश आलावा (वय २५, रा. डेडगाव, ता. मनावर, जि. धार, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून ५५ हजार रुपये रोख, इअरबड्स, मनगटी घड्याळ तसेच चोरीस गेलेली कागदपत्रे असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार सुनील पाठक, संतोष पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर आणि विजय ढिवरे यांनी केली.
