क्राईम ब्लास्ट ब्यूरो
पोर्तुगीजांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील केन्या आणि मोझाम्बिक ह्या देशांतून गुलाम म्हणून आणलेल्या मूळ ‘बंतु’ लोकांचे हे वंशज आहेत. पूर्वी गोव्यात असलेले हे सिद्दी नंतर गोवे सोडून लगतच्या उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यातील यल्लापूर, हळियाळ, मुंडगोड, शिरसी आणि अंकोला तालुक्यांतील खेडी आणि घाटातल्या अरण्यप्रदेशात वास्तव्यास आले. आजही बहुतांश सिद्दी इथेच राहतात. उत्तर आफ्रिकी भाषेत “सिद्दी” आदरार्थी शब्द असल्याचे सांगितले जाते. काहींच्या मते तो मूळ अरबी “सय्यद” ह्या शब्दावरून आलेला आहे.
भारतात ज्या स्वामींचे ते दास झाले, त्यांचीच भाषा आणि धर्म त्यांनी अंगीकारले. बहुतेक हिंदू सिद्दींची मातृभाषा कोंंकणी/मराठी, ख्रिस्ती सिद्दींची कोंंकणी आणि मुस्लिम सिद्दींची उर्दू आहे. सर्वांना कन्नडदेखील उत्तम येते. लोकसंख्या कमी असल्यामुळे हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती सिद्दींमध्ये परस्पर विवाह होतात. त्यांच्या मूळ आफ्रिकी संस्कृतीचा आणि भाषेचा त्यांना पूर्ण विसर पडलेला दिसून येतो, पण ढोल आणि नृत्य हे मूळ संस्कृतीचे दोन दुवे त्यांनी आजवर जपले आहेत.
पिढ्यानपिढ्या सिद्दी लोकांचा भारतात दास आणि कमीत कमी पैशांत राबणारे श्रमिक म्हणून वापर होत आला आहे. शिक्षणाचा प्रसार आता हळूहळू होत असला तरीही त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मागासलेलीच आहे. भारतीय शासनाने त्यांना अनुसूचित जमात म्हणून मान्यता दिली असून आज महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत हे सिद्दी पसरले असल्याचे कळते. बहुतांश लोकं त्यांना परदेशीच समजत असले तरीही ते तुमच्या आणि माझ्याइतकेच भारतीय आहेत. सिद्दी लोकांवर आधारलेला एक फार छान माहितीपट यूट्यूबवर उपलब्ध आहे, तोही मराठीत (शीर्षक: रानाची पाखरं).
मुरुड-जंजिऱ्याचे मुस्लिम नवाबदेखील आफ्रिकी सिद्दी होते पण त्यांना पोर्तुगीजांनी दास म्हणून भारतात आणलेले नव्हते. अहमदनगर सुलतानांच्या सिद्दी नौसेनाधिपतीने जंजिरा गड जिंकल्यानंतर सिद्दी नवाबशाही अस्तित्वात आली.